चौल रेवदंडा - Chaul Revdanda

    आज आपण पोर्तुगिजांनी बांधलेल्या किल्ल्याविषयी माहिती घेऊया. तर कुंडलिका नदीचा आणि अरबी समुद्राचा संगम होतो असे ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालूक्यातील रेवदंडा गाव. या रेवदंडा गावातून जंजिर्‍याच्या सिद्धीच्या आणि मुंबईकर इंग्रजाच्या सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगिज कॅप्टन सोज याने १५२८ साली किल्ला बांधावयास सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी १५२१ ते १५२४ सालादरम्यान रेवदंडा गावाभोवती तटबंदी बांधून घेतली. या रेवदंडा गडावर तीन राज्यकर्त्यांनी राज्य केले एक अर्थातच पोर्तुगिज दुसरे मराठे आणि तिसरे इंग्रज. तर हा झाला रेवदंडा किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास.

 

    किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच पोर्तुगिजांचे राजचिन्ह कोरलेले दिसते. हा किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व खात्याकडे असला तरी काही ठिकाणी किल्ल्यावर खाजगी मालकी हक्‍क असल्याचे समजून येते त्यामुळे संपूर्ण किल्ला पहावयास मिळत नाही. किल्ला आणि भोवतालची तटबंदी बर्‍याच ठिकाणी ढासळलेल्या अवस्थेत आहेत.

 

    किल्ला पाहून झाल्यानंतर पश्चिमेस असलेला नितांत सुंदर नारळी पोफळीच्या झाडांनी बहरलेल्या अशा निवांत समुदकिनार्‍याला भेट द्यावी व या सागरी किनार्‍याचा मन्मुराद आनंद लुटावा. या किनार्‍यावर सकाळी सकाळी फेरफटका मारायला गेल्यास येथे जास्त कोणी दिसणार नाहीत शक्यतो येथे सकाळी दहा अकराच्या सुमारास पर्यटक, विक्रेते यांची येण्यास सुरुवात होते.

 

    समुद्र किनार्‍याचा मनमुराद आनंद घेऊन झाल्यावर येथून जवळच असलेल्या पोर्तुगिजांनी बांधलेल्या चर्चला भेट देऊन पुढे चौलचे विख्यात असलेले टेकडीवरचे दत्त मंदिर आहे. सुमारे १,५०० पायर्‍या चढून मंदिराच्या परिसरात येता येते, दत्ताची मन्मोहक मुर्ती बघून मन प्रसन्न होते. मंदिराच्या अवती भवतीचा परिसरही नयनरम्य आहे. तसेच साळावच्या प्रसिद्ध गणेश मंदिरास भेट द्यावी. साळावच्या गणेश मंदिरासही मुख्यतः सायंकाळच्या वेळीस भेट द्यावी कारण येथे केलेल्या नयनरम्य रोषणाई आणि कारंजे यांची मजा लुटता येते.

 

    तर अशा प्रकारे तुम्ही चौल रेवदंड्‍याची सफर आनंददायी आणि भक्तीपूर्ण वातावरणात करु शकता.

 

    रेवदंडा येथे गावात उत्तम राहण्याच्या आणि जेवणाच्या अनेक सोयी उपलब्द आहेत.

 

    शेवटी एक नेहमीची सूचना : किल्ला आणि समुद्र किनारी फिरताना कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची काळजी घ्या, निसर्गाचा आनंद घ्या आणि परिसराची स्वच्छता राखा.


जवळील ठिकाणे : फणसाड वन्यजीव अभयारण्य, अलिबाग समुद्रकिनारा, काशिद समुद्रकिनारा, मुरुड-जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला इत्यादी...

 

कसे जायचे : मुंबईमधून अलिबाग मुरुड मार्गवर रेवदंडा येथे येता येते. जर तुम्ही सार्वजनिक वाहणाने येणार असाल तर मुंबई ठाण्याकडे जाणारी वाहणे मर्यादित प्रमाणातच असल्यामुळे वेळापत्रकाप्रमाणे प्रवास करावा.

 

कधी जायचे : ऑक्टोबर ते मार्च महिन्या दरम्यान येथील वातावरण आल्हाददायक असते.

 

तालुका : अलिबाग

 

जिल्हा : रायगड

 

राज्य : महाराष्ट्र

टिप्पण्या