वेलास समुद्रकिनारा, रत्‍नागिरी - Velas Beach, Ratnagiri

    ऑलिव्ह रिडली जातीच्या कासवांसाठी प्रसिध्द असलेले अंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील वेलास हे गाव आणि ह्या गावचा वेलास समुद्रकिनारा.

 

   पूर्वेला डोंगराने वेढलेला आणि पश्चिमेला अथांग असा निळाशार समुद्र अशा निसर्गसौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा म्हणजे वेलास. वेलास गावचा इतिहास म्हणजे नाना फडणवीस यांचे हे जन्मगाव. एवढीच माहिती अनेकांना वेलास गावाबद्दल माहित असावी त्यामुळे दुर्लक्षीत असलेले हे गाव. पण हे गाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागले आहे ते ऑलिव्ह रिडली प्रजातीच्या कासवांमुळे. या ऑलिव्ह रिडली प्रजातीची कासवे त्यांच्या विणीच्या (प्रजनन काळ) हंगामात या वेलासच्या सुरक्षित समुद्रकिनारी त्यांची असंख्य अंडी देतात व मार्च अखेरपर्यंत त्या अंड्‍यातून निघणारी पिल्ले त्याच्या मुक्‍कामी म्हणजे समुद्रात परतात.

 

     गावातील मंडळी या कासवांच्या अंड्‍यांचे चांगल्याप्रकारे संगोपन करतात. तसेच गावातीलच सह्याद्री निसर्ग मित्र संघटनेचे स्वयंसेवक सकाळपासूनच समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पर्यटकांना कासवांबाबतीत योग्यते मार्गदर्शन करतात. येथे कासवांची अंडी नैसर्गिकरित्या कशी उबवली जातात ते देखील दाखवले जाते. ज्यावेळी किनार्‍यावरील जमा केलेल्या अंड्‍यांतून पिल्ले बाहेर येण्याच्या वेळेस गावकरी दरवर्षी कासव महोत्सव (टर्टल फेस्टिवल) आयोजित करतात. यावेळी ते टप्प्याटप्प्याने नवजात पिलांना समुद्रात सोडतात, त्यावेळीतर त्यांची ती अथांग सागराकडे पहिले पाऊल टाकण्याचा प्रयत्‍न करतात, हे दृष्य पाहून मन मोहून जाते. हे सर्व अनुभवण्यासाठी फेब्रुवारी, मार्च महिन्यात वेलास समुद्रकिनारी भेट देणे आवश्य आहे.

 

      वेलास ग्रामस्थांच्या या परोपकारी भावनेमुळे त्यांनी या कासवांच्या संगोपण आणि संरक्षणाचा वसा घेतला आहे, या त्यांच्या अमुल्य प्रयत्‍नांमुळेच आज एक दुर्लक्षित वेलास समुद्रकिनारा जागतिक पातळीवर नाव लौकिक मिळवत आहे.

 

    येथे राहण्यासाठी उत्तम सुविधादेखील उपलब्ध आहेत. तर मग जरुर वेलास या जगप्रसिद्ध समुद्रकिनार्‍याला भेट द्या.

 

        वरील माहिती कशी वाटली त्याबद्दलचा अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून जरुर सांगू शकता. माहिती आवडल्यास सामायिक (शेअर) करा आणि सभासद (सबस्क्राईब करा) व्हा.


    शेवटी एक नेहमीची सूचना : या ठिकाणी फिरताना कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची काळजी घ्या, निसर्गाचा आनंद घ्या आणि परिसराची स्वच्छता राखा.

 

जवळील ठिकाणे : बाणकोट किल्ला, रायगड जिल्ह्‍यातील हरिहरेश्वर मंदिर आणि समुद्रकिनारा,

 

कसे जायचे : मुंबई ते वेलास समुद्रकिनारा येथे जाण्यासाठी रायगडमधील म्हासळा मार्गे बागमांडला येथे येऊन फेरी बोटीने वेसावी येथे उतरुन वेलास समुद्रकिनारी पोहोचता येते हे अंतर साधारणतः १९० कि. मी एवढे आहे आणि सहा तास प्रवास करावा लागतो. तसेच तुम्ही इंदापूर, माणगाव, म्हासळा मार्गेही प्रवास करु शकता, हे अंतर साधारण २०५ कि. मी आहे. पुणे येथून येताना ताम्हिणी घाट, निजामपूर, माणगाव, म्हासळा मार्गे येऊ शकता. येथे येताना शक्यतो स्वतःचे वाहण घेऊन जाते सोयीस्कर आहे. कारण सार्वजनिक वाहतूकीने यायचे झाल्यास बराच वेळ लागू शकतो.

 

कधी जायचे : ऑक्टोबर ते मार्च महिना या दरम्यान येथे आल्हाददायक वातारण असते.

 

तालुका : मंडणगड

 

जिल्हा : रत्‍नागिरी

 

राज्य : महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गांधारपाले लेणी, महाड - Gandharpale Caves, Mahad

फणसाड वन्यजीव अभयारण्य - Fansad Wildlife Sanctuary

थिबा राजवाडा - Thiba Palace